Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम तत्परतेने व दर्जात्मक व्हावे - आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरणाचे चालू असलेले काम तत्परतेने व दर्जात्मक व्हावे यासाठी चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.
पनवेल-महाड-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६चे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालू आहे. तसेच हे काम घाटमाथ्याचे असलेने दर्जेदार व्हावे व चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेतील RE वॉल VUP चा पूल रद्द करणे आणि सावर्डे बाजारपेठेत सिंगल पिलर पुलाचे बांधकाम आणि इतर महामार्गाच्या समस्या याबाबत चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
     
गेली सहा-सात वर्षे पनवेल-महाड-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६चे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालू आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे हे जोखमीचे व धोकादायक होत चालले आहे. या मार्गाने शिमगा, गौरी-गणपती, लग्न-सराई यासाठी मुंबई चाकरमान्यांची ये-जा होत असते. परंतु चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालु असल्याने तसेच झालेले काम हे दर्जाहीन असलेने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच दरड कोसळणे, रस्त्याला भेगा पडणे या समस्या देखील भेडसावत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची हा मार्ग जलदगतीने पुर्ण व्हावा, उत्तम दर्जाचा व्हावा अशी मागणी सातत्याने होत असलेने जनतेचा विचार करता निकम यांची ही भेट फायदेशीर ठरणार आहे. 
     
तसेच हा महामार्ग चिपळूण येथील सावर्डे गावातून जातो. परशुराम ते आरवली (PKG-5) या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सावर्डे गाव हे ५४ गावांचे केंद्र आहे. या गावांची मुख्य बाजारपेठ सुमारे १४००० (चौदा हजार) लोकसंख्या असलेले सावर्डे हे गाव आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे कारण येथे शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आहेत. सावर्डे येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सावर्डे मार्केटमधील चौकोनी चौकाखाली सलग दोन अंडरपास (व्हीयूपीएस) मंजूर करण्यात आले आहेत. आरई भिंतींमुळे व्यापारी आणि लगतच्या गावातील स्थानिक ग्रामस्थ/रहिवासी यांची गैरसोय होणार आहे. सावर्डे गावातील ग्रामस्थांनी आरई वॉल VUP पुलांऐवजी बाजारपेठेत विहित लांबीच्या एकाच खांबावर उड्डाण पूल बांधावा. यामध्ये सिंगल पिलर पुलाच्या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाची मागणी आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून तो सिंगल पिलर पूल व्हावा, अशी नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांची तीव्र इच्छा आहे. आरई वॉल व्हीयूपी पूल बांधल्यास बाजारपेठ दोन भागात विभागली जाईल आणि ९० टक्के व्यापाऱ्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने हे धोक्याचे ठरणार आहे. 
      
या सर्व बाबी लक्षात घेऊन नागरिकांनी सिंगल पिलर ब्रिजची मागणी करूनही आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून सिंगल पिलर ब्रिज करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून सिंगल पिलर पूल होण्याचा निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा व  महामार्गावरील समस्यांचा विचार करून सावर्डे येथे सिंगल पिलर पूल बांधण्याचा निर्णय तातडीने घ्यावा व यात सावर्डे बाजारपेठेतील लांबीचा सिंगल पिलर उड्डाणपूल मंजूर करण्यात काही अडचण येत असल्यास नागरिकांच्या मागणीचा विचार करून सावर्डे मार्केट लांबीच्या महामार्गाचे चौपदरी रुंदीकरण मंजूर करावा, अशी मागणी या भेटीदरम्यान आमदार निकम यांनी गडकरी यांचेकडे करुन सकारात्मक चर्चा केली.
     
या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांचेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बाबजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments